
भुमराळा शिवारातील शेतकऱ्यांचे हाल – शेतरस्त्यांवर चिखल व पाणी साचल्याने शेतकरी त्रस्त
लोणार तालुका प्रतिनिधी : ज्ञानेश्वर महादु मोरे,
भुमराळा शिवारातील शेतात जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी व चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतरस्ते पक्के करून देण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात आजतागायत कोणत्याही कामाची सुरुवात झालेली नाही.
यामुळे शेतकऱ्यांना दररोज शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बैलगाडी, ट्रॅक्टर शेतात नेणे तर दूरच, परंतु पायी चालत जाणे सुद्धा अशक्यप्राय झाले आहे. चिखलामध्ये चालताना शेतकऱ्यांच्या पायात काचेचे तुकडे, अणकुचीदार गारा, दगड घुसून शेतकरी व शेतमजूर जखमी होत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने त्वरित कारवाई करून शेतरस्ते पक्के करावेत, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी रोज चिखलात रुतत शेतात जातो, पण प्रशासन मात्र एसीमध्ये बसून बघ्याची भूमिका घेतंय — हा कसला न्याय?
रस्ते पक्के करण्याच्या घोषणा केल्या, पण शेतकऱ्यांचे रस्ते अजूनही चिखलात — आश्वासनं की थट्टा?
शेतकऱ्यांचा घाम आणि रक्त चिखलात मिसळतंय, पण मंत्र्यांचं आश्वासन अजून कागदावरच — शेतकरी किती दिवस वाट बघणार?



