श्रेयस पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मायबोली कर्णबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय, येवला तालुका अंगणगाव येथे सामाजिक

श्रेयस पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मायबोली कर्णबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नाशिक – येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय, येवला तालुका अंगणगाव येथे सामाजिक जाणिवेचा एक हृदयस्पर्शी उपक्रम साजरा करण्यात आला. पाबळे कुटुंबातील चिरंजीव श्रेयस पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आजोबा रामदासअण्णा पाबळे यांच्या हस्ते कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
मायबोली निवासी विद्यालयात वास्तव्यास असलेली ही मुले ऐकू व बोलू शकत नसली तरी त्यांच्या डोळ्यातील स्वप्नं जिवंत ठेवण्याचं काम या उपक्रमातून घडताना दिसून आलं. पेन, पेन्सिल, खोडरबर, वह्या, दप्तर, पॅड यासारख्या रोजच्या गरजेच्या शालेय वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता.
यावेळी समता प्रतिष्ठानचे संस्थापक अर्जुनराव कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रामदासअण्णा पाबळे यांच्यासारख्या समाजाभिमुख व्यक्तींच्या हातून घडणारी सेवा ही समाजासाठी दिशादर्शक आहे. कर्णबधिर मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणे ही खरी माणुसकी असून, अशा संस्कारांचा वारसा श्रेयस पाबळे यांना नक्कीच लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास एरंडगाव येथील सरपंच काका पडवळ, अशोक नाना, नवनाथ पाबळे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे सर उपस्थित होते. सूत्रसंचालनादरम्यान विद्यालयातील शिक्षकवृंदाने सांगितले की, अशा सातत्याने लागणाऱ्या शालेय वस्तू कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी फार मोलाच्या ठरतात आणि त्यातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
या उपक्रमावेळी विद्यार्थ्यांनी साहित्य स्वीकारताना पाबळे कुटुंबाबद्दल आपुलकी व्यक्त केली. त्यांच्या निरागस भावनांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. काही क्षण असे होते की ते थेट काळजात साठून राहिले.
यानंतर रामदासअण्णा पाबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, परमेश्वराने आम्हाला आजवर कशाचीही कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे समाजातील गरजू, मुक्या-बधिर मुलांसाठी काहीतरी करता आलं, याचं समाधान आयुष्यभर पुरेल. समता प्रतिष्ठान आणि मायबोली विद्यालयाशी आमचं नातं असंच जपलं जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चिरंजीव श्रेयस पाबळे यांनीही मनोगतात सांगितले की, या मुलांच्या सहवासात आलेला आजचा अनुभव आयुष्यभर प्रेरणा देणारा आहे. भविष्यातही कोणताही भेदभाव न करता संस्थेला आवश्यक ती मदत आपल्या फाउंडेशनमार्फत दिली जाईल.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या ‘मदर तेरेसा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या शिक्षिका पडवळ मॅडम यांनी स
र्वांचे आभार मानले.




