तकलादी येथील नविन पुलावरून वाहतूक सुरूच; नागरिकांच्या जीविताशी प्रशासनाचा धोकादायक खेळ
राहेरी बु. गावाजवळील खडकपुर्णा नदीवरील जुना पूल नादुरुस्त झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक

तकलादी येथील नविन पुलावरून वाहतूक सुरूच; नागरिकांच्या जीविताशी प्रशासनाचा धोकादायक खेळ
अपघात झाल्यास जबाबदार कोण? प्रशासन की कॉन्ट्रॅक्टर?
दुसर बीड (प्रतिनिधी) — गजानन सोनुने
राहेरी बु. गावाजवळील खडकपुर्णा नदीवरील जुना पूल नादुरुस्त झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नविन पूल उभारण्यात आला. मात्र हा पूल आणि त्यावरून जाणारा रस्ता अवघ्या काही कालावधीतच निकृष्ट दर्जाचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पुलावर व रस्त्यावर जागोजागी मोठे तडे, खचलेले भाग आणि संरक्षणात्मक संरचनेचे नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता या पुलावरून वाहतूक सुरू ठेवली आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये तीव्र झाली आहे.
या पुलाच्या एका बाजूची संरक्षण भिंत पूर्णपणे तुटलेली असून, त्या ठिकाणी केवळ मुरूम व दगड टाकून तात्पुरती भर घालण्यात आली आहे. कोणतेही लोखंडी रेलिंग, सिमेंट काँक्रीटची कायमस्वरूपी संरक्षक भिंत किंवा इतर सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे थोडासा तोल गेला किंवा वाहन घसरले, तर वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा पूल अधिक धोकादायक ठरत आहे.
या पुलावरून दररोज दुचाकी, चारचाकी वाहने तसेच काही वेळा जड वाहनेदेखील ये-जा करतात. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार, रुग्णवाहिका आणि आसपासच्या अनेक गावांतील ग्रामस्थ याच पुलावरून प्रवास करतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पूरस्थितीत यापूर्वीही हा पूल बंद करण्यात येत असल्याने, या मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ दराडे, सुरेश भाऊ बुलकडे, शेख जावेदभाई आणि कैलास कास्तोडे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांची जोरदार मागणी आहे की, या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ तांत्रिक पाहणी करावी. पुलावरील सर्व दोष दूर करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. तोपर्यंत पुलावरून होणारी वाहतूक मर्यादित करावी, आवश्यक ठिकाणी लोखंडी रेलिंग, संरक्षक भिंती, सूचना फलक आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास प्रशासनाची जबाबदारी टाळता येणार नाही, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.




