भुमराळा गावच्या शिवारातील शेतरस्त्यांची दयनीय अवस्था – शेतकऱ्यांचा संताप उसळला!

भुमराळा गावच्या शिवारातील शेतरस्त्यांची दयनीय अवस्था – शेतकऱ्यांचा संताप उसळला!
लोणार तालुका प्रतिनिधी : ज्ञानेश्वर महादु मोरे,
भुमराळा (ता. लोणार जिल्हा बुलढाणा ) — आज पाऊस थांबून तब्बल पंधरा दिवस उलटून गेले, तरीही भुमराळा गावच्या शिवारातील शेतरस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. शेतरस्त्यांवर अजूनही चिखल व पाणी साचलेले असून, शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्यासाठी अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
सरकारकडून “शेतरस्ते सुधारणा”च्या घोषणा होत असल्या, तरी त्या केवळ कागदावरच दिसतात. प्रत्यक्षात मात्र या रस्त्यांवरून जाणं म्हणजे जिवाशी खेळण्यासारखं झालं आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,
> “रस्त्यांवर गाडी घेऊन गेलं की बैलगाडी चिखलात फसते, बैलांचे पाय मुरगळतात, काही वेळा बैलांना इजा होते, ट्रॅक्टर पलटी होतात, तर शेतमाल चिखलात सांडतो. वर्षभर प्रचंड कष्ट करून पिकवलेला माल फक्त या दुरावस्थेमुळे नष्ट होतो.”
अशा घटनांचा रोजचा क्रम सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतमाल घरी आणणं कठीण झालं आहे. त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच आहे, पण मानसिक त्रासही दिवसेंदिवस वाढत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे तहसीलदार साहेबांनी तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावं, आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी भुमराळा गावातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
अन्यथा, गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.




