जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘संवाद सभागृहाचे’ पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
वाशिम (जिमाका) : नागरिक व पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी,

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘संवाद सभागृहाचे’ पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
वाशिम (जिमाका) : नागरिक व पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी, सुलभ व पारदर्शक व्हावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘संवाद सभागृहाचे’ उद्घाटन राज्याचे पालकमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांच्या शुभहस्ते आज दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, भाप्रसे परीविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपविभागीय अभियंता संचित शिंदे, शासकीय कंत्राटदार सुरेश दहात्रे यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे म्हणाले की, ‘संवाद सभागृहामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना व अडचणी थेट पोलीस प्रशासनापर्यंत मांडण्यासाठी एक स्वतंत्र व विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी संवेदनशीलतेने ऐकून त्यावर वेळेत व योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.’
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिक आणि पोलीस यांच्यातील परस्पर विश्वास, सहकार्य व समन्वय अधिक मजबूत होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी संवाद सभागृहाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देताना सांगितले की, दररोज ठराविक वेळेत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातील. प्राप्त तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन त्या संबंधित शाखा व विभागांकडे पाठवण्यात येतील व त्यावर वेळेत कार्यवाही सुनिश्चित करण्यात येईल.
यामुळे नागरिकांना पोलीस कार्यालयाच्या फेऱ्या कमी पडतील आणि समस्यांचे जलद निराकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संवाद सभागृहाच्या माध्यमातून महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, वाहतूक कोंडी व अपघात, सार्वजनिक सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच विविध नागरी प्रश्नांवर त्वरित दखल घेण्याची यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता निर्भयपणे आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




