नागापूर येथे खंडेराव महाराज बारा गाड्यांचा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न
नागापूर येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचा पारंपरिक बारा गाड्यांचा महोत्सव

नागापूर येथे खंडेराव महाराज बारा गाड्यांचा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
नागापूर येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचा पारंपरिक बारा गाड्यांचा महोत्सव अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक श्रद्धेच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण नागापूर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
या महोत्सवाच्या निमित्ताने पायी नवरदेव मानकरी म्हणून प्रविण रघुनाथ सोमासे यांनी ग्रामस्थांसह पायी जेजुरी येथे जाऊन कुलदैवत श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर खंडोबाची पवित्र काठी डीजे, ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वाद्यांच्या निनादात नागापूर गावात भव्य मिरवणुकीने आणण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
परंपरेनुसार मानकरी असलेल्या नवरदेवावर हळद लावण्याचा विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडण्यात आला. यानिमित्त खंडोबा मंदिराच्या आवारात सलग सात दिवस विविध जागरण, हरिपाठ, कथा व भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भाविकांनी रात्री उशिरापर्यंत जागरणाचा भक्तिभावाने आनंद लुटला.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विशेष आकर्षण ठरले ते बारा गाड्यांचे भव्य दर्शन. ग्रामस्थ व मानकरी कुटुंबीयांनी सजवलेला नवरदेव पारंपरिक वेशभूषेत बारा गाड्यांवर स्वार झाला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गाड्या ओढण्यात आल्या. या वेळी “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
सात दिवस चाललेल्या या महोत्सवात ग्रामस्थ, नातेवाईक, युवक मंडळे व महिला मंडळे एकत्र येत नृत्य, भक्तिगीत व आनंदोत्सव साजरा करत खंडोबा महाराजांच्या भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. महोत्सवाच्या निमित्ताने गावात सामाजिक सलोखा, एकोपा व भक्तीभावाचे सुंदर दर्शन घडले.
या पारंपरिक बारा गाड्यांच्या महोत्सवामुळे नागापूर गावाची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ झाली असून, भाविकांच्या श्रद्धेला नवे बळ मिळाले आहे. महोत्सव शांततेत व यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.



