वेळेचे भान, नियमांचे पालन, शांत मन आणि आई-वडील, शिक्षक व गावाच्या आशीर्वादावर
उभे राहिलेले बारावीच्या विद्यार्थ्यांचे यशस्वी भविष्य

वेळेचे भान, नियमांचे पालन, शांत मन आणि आई-वडील, शिक्षक व गावाच्या आशीर्वादावर उभे राहिलेले बारावीच्या विद्यार्थ्यांचे यशस्वी भविष्य
विशेष प्रतिनिधी देऊळगाव राजा गजानन नागरे मेंडगाव
प्रिय बारावीच्या विद्यार्थ्यांनो,
आज दिनांक १० डिसेंबर २०२६ पासून तुमची बारावीची कसोटी सुरू होत आहे. हा दिवस तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे. हा फक्त पेपर नाही तर तुमच्या आतापर्यंतच्या कष्टांची, जिद्दीची आणि स्वप्नांची परीक्षा आहे. त्यामुळे कोणताही ताण न घेता, मन शांत ठेवून आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.
आपल्याकडे मिळालेल्या माहितीनुसार पेपरची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेआधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे. वेळेवर गेल्यास बसायची जागा नीट सापडते, टेबल नंबर कळतो आणि मन स्थिर राहतं. उशीर झाला तर धावपळ होते, गडबड होते आणि त्याचा परिणाम थेट पेपरवर होतो. म्हणून वेळेचे भान ठेवणे फार गरजेचे आहे.
शिक्षण विभागाने सांगितलेल्या नियमांनुसार फक्त आवश्यक तेच साहित्य सोबत घ्यावे. नको त्या वस्तू नेऊ नयेत. नियम पाळले तर कोणालाही अडचण येत नाही आणि तुम्ही शांतपणे पेपर लिहू शकता.
प्रिय विद्यार्थ्यांनो,
आज तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी आई-वडिलांचे कष्टांचे आशीर्वाद आहेत. आईने केलेली धावपळ, वडिलांनी घाम गाळून कमावलेले पैसे, शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन आणि विश्वास आज तुमच्यासाठी ताकद आहे. संपूर्ण गाव तुमच्याकडे आशेने पाहत आहे.
आज तुम्ही जे लिहाल त्यावर तुमचं उद्याचं आयुष्य उभं राहणार आहे. आज चांगले गुण मिळवून आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करा, आपल्या शाळेचा आणि गावाचा अभिमान वाढवा. आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे, हे कधीही विसरू नका.
धीर सोडू नका. मन शांत ठेवा. जे येतं ते नीट, समजून, आत्मविश्वासाने लिहा. देव, आई-वडील, शिक्षक आणि गावाची साथ तुमच्यासोबत आहे. यश तुमच्यापासून दूर नाही.
सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
शेतकरी योद्धा कृती समिती
बुलढाणा जिल्हा




