देऊळगाव कंडुपाळ येथील विकासकामांतील घोटाळ्याविरोधात आमरण उपोषण
शिवसेना जिल्हाप्रमुख बळीरामजी मापारी यांची उपोषण स्थळी भेट; महिला उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

देऊळगाव कंडुपाळ येथील विकासकामांतील घोटाळ्याविरोधात आमरण उपोषण
जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार
शिवसेना जिल्हाप्रमुख बळीरामजी मापारी यांची उपोषण स्थळी भेट; महिला उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा
देऊळगाव कंडुपाळ (ता. लोणार, जि. बुलढाणा) —
देऊळगाव कंडुपाळ व परिसरातील विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे व ठेकेदारांच्या मनमानीविरोधात ग्रामपंचायत सदस्या सौ. नंदाबाई प्रमेश्वर राठोड यांनी पंचायत समिती कार्यालय, लोणार यांच्यासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राजकीय व सामाजिक पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे.
दि. ४ फेब्रुवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. बळीरामजी मापारी यांनी उपोषण स्थळी भेट देत महिला उपोषणकर्त्या सौ. नंदाबाई राठोड यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत, दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा स्पष्ट इशारा दिला.
या भेटीवेळी युवासेना तालुका प्रमुख गजानन मापारी,राजु भाऊ बुधवत माजी नगराध्यक्ष बाबूशिंग जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती संजय आटोळे, युवासेना उपतालुका प्रमुख संतोष सरकटे, विजय चव्हाण, समाधान राठोड, परमेश्वर राठोड तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील नरवाडे, अमोल सरकटे, ज्ञानेश्वर गाढवे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती.
तांडा समृद्धी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अवघ्या काही दिवसांतच रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तसेच सार्वजनिक शौचालयाचे बांधकामही हलक्या व दर्जाहीन साहित्याने करण्यात आल्याने शासन निधीचा सरळसरळ अपहार झाल्याचा गंभीर आरोप सौ. नंदाबाई राठोड यांनी केला आहे. देऊळगाव कंडुपाळ येथील सर्व विकासकामांची जिल्हास्तरीय, निष्पक्ष चौकशी करून दोषी ठेकेदार, अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
याबाबत यापूर्वी वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सौ. राठोड यांनी स्पष्ट केले. न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, उपोषण काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.




