शासन निर्णय धाब्यावर : बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी वनक्षेत्रपालांची टाळाटाळ

शासन निर्णय धाब्यावर : बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी वनक्षेत्रपालांची टाळाटाळ
पत्रकार, गजानन कहाळे
तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल सी. बी. खेरडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन न करता कार्यालय बंद ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासन निर्णय क्रमांक जपुती २०२४ / प्र.क्र.१६ / कार्या-जपुक (२९), दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ नुसार राष्ट्रपुरुष आणि थोर महापुरुषांचे जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे शासकीय कार्यालयांना बंधनकारक आहे. मात्र या स्पष्ट शासन आदेशाचे उल्लंघन करत वनक्षेत्रपालांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे संबंधित अधिकारी मुख्यालयी असतानाही महामानवांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वेळ काढला गेला नाही. कोणतीही सूचना न देता कार्यालय बंद ठेवण्यात आल्याने हे कृत्य कर्तव्यातील गंभीर कसूर मानले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्ववंदनीय आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या विचारांवरच आजचा भारत उभा आहे. अशा महामानवाबद्दल शासकीय अधिकाऱ्यांकडून होत असलेली ही टाळाटाळ अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी विभागीय वनाधिकारी (DFO) व सहाय्यक वनसंरक्षक (ACF), बुलढाणा यांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण वनवृत्त, अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार गजानन कहाळे यांनी दिली असून, संबंधितांवर त्वरित चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.




