सेवाकार्यातून मिळणारे आशीर्वादच यशाचे खरे समाधान देतात – अशोकभाऊ बारब्दे
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई–कोकण विभागीय १० वा विचारमंथन मेळावा उत्साहात संपन्न

सेवाकार्यातून मिळणारे आशीर्वादच यशाचे खरे समाधान देतात – अशोकभाऊ बारब्दे
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई–कोकण विभागीय १० वा विचारमंथन मेळावा उत्साहात संपन्न
विविध घटकांना श्रद्धांजली, मान्यवरांचा सन्मान, नियुक्तीपत्रे व ओळखपत्रांचे वितरण
तेल्हारा/अकोला प्रतिनिधी – राजेश पाटील खारोडे
समाजातील गरजू, उपेक्षित व पीडित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकस्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून कार्य करत राहणे, मानवी मूल्ये जपणारी आरोग्यसेवा व सामाजिक कल्याणाची कामे करणे यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही. सेवाकार्यातून मिळणाऱ्या आशीर्वादाच्या बळावरच यशाचे खरे समाधान लाभते, असे प्रतिपादन निवृत्त मंत्रालयीन सचिव तसेच मुंबई येथील विदर्भ वैभव मंदिराचे अध्यक्ष अशोकभाऊ बारब्दे यांनी केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या मुंबई–कोकण विभागाचा १० वा विचारमंथन मेळावा मुंबईतील विदर्भ वैभव मंदिर येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना अशोकभाऊ बारब्दे बोलत होते.
यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी संघटन वाढीसाठी निष्ठा, कर्तव्यभावना व सातत्यपूर्ण संपर्क किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले. “फक्त मोबाईलच्या माध्यमातून संपर्क ठेवून काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर संघटना अधिक व्यापक व प्रभावीपणे वाढू शकते,” असे त्यांनी नमूद केले. तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांमुळे शासन व प्रशासन पातळीवर निर्माण झालेल्या सकारात्मक प्रभावाची उदाहरणेही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.
या विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे, महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विदर्भ वैभव मंदिराचे सरचिटणीस गजाननजी नागे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना, अत्याचारग्रस्त महिलांना, दिवंगत पत्रकारांना तसेच नैसर्गिक आपत्ती व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या मेळाव्यात संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
मुंबई प्रदेश अध्यक्षपदी अशोकभाऊ बारब्दे,
लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी गजाननजी नागे,
तर सोलापूर जिल्हा संघटन संपर्क प्रमुखपदी भिसे यांची नियुक्ती करून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे (आय-कार्ड) वितरण करण्यात आले.
यावेळी मंत्रालयीन समन्वयक व महाराष्ट्र संघटन प्रमुख रफिक मुलानी, ठाणे जिल्हा संघटन प्रमुख संजय सोळंके, मुंबई महिला आघाडी प्रमुख सौ. सुषमा ठाकूर–ढोले, उमेश चौधरी, राजीव विश्वकर्मा, विदर्भ समाज मिरा–भाईंदर अध्यक्ष संजय जायभाये, माळी, विकास भोसले, राजेंद्र आंगणे, सी.ए. तुषार तल्हार, सौ. प्रतीक्षा तल्हार यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. सुषमा ठाकूर–ढोले यांनी केले. संपूर्ण मेळावा मार्गदर्शन, सन्मान, संघटनात्मक चर्चा व स्नेह मिलन अशा विविध उपक्रमांनी यशस्वीरीत्या पार पडला.



