हर्षवर्धन जाधव यांचा दिगाव खेडी येथे सर्कल मेळावा उत्साहात संपन्न निधीअभावी विकास कामे रखडली; सर्वसामान्य जनता त्रस्त – मा. आमदार हर्षवर्धन जाधव
हर्षवर्धन जाधव यांचा दिगाव खेडी येथे सर्कल मेळावा उत्साहात संपन्न निधीअभावी विकास कामे रखडली; सर्वसामान्य जनता त्रस्त – मा. आमदार हर्षवर्धन जाधव
प्रतिनिधी : विशेष प्रतिनिधी , कन्नड | छत्रपती संभाजीनगर
कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तालुक्यात जिल्हा परिषद सर्कलनिहाय मेळाव्यांची मालिका सुरू केली असून, प्रत्येक मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी दिगाव खेडी येथे सायंकाळी सर्कल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कडाक्याच्या थंडीमध्येही रात्री दहा वाजेपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, यावरून जनतेतील असंतोष व अपेक्षा स्पष्टपणे दिसून आल्या.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बोलताना त्यांनी सध्याच्या शासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली.
निधीअभावी विकास कामांना खीळ
हर्षवर्धन जाधव म्हणाले की, शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसून, विहीर, गाय गोठा योजनेचे अनुदान देखील अनेक लाभार्थ्यांना अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
१५ व्या वित्त आयोगाचा निधी रखडलेला
अनेक ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी अद्याप मिळालेला नाही, यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असून गावातील मूलभूत सुविधा व विकासकामांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच ही गंभीर परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप त्यांनी केला.
तरुणांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह
शासनाकडून तरुणांना नोकऱ्या देण्याची जी आश्वासने दिली जात आहेत, ती प्रत्यक्षात खोटी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना रोजगाराच्या संधी मात्र उपलब्ध होत नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासकीय योजना फक्त निवडकांपुरत्याच
शासनाच्या विविध योजना केवळ निवडक लाभार्थ्यांपर्यंतच मर्यादित राहत असून, खरे गरजू लाभार्थी या योजनांपासून वंचित राहात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणुका होऊन बराच कालावधी लोटला तरी तालुक्यासाठी आमदार निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच राजू तुपे यांनी केले, तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास परिसरातील विविध गावांतील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्कल मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आपला प्रयत्न सुरूच राहील, असे आश्वासन हर्षवर्धन जाधव यांनी शेवटी दिले.




