प्रत्येक राज्यात उपपंतप्रधानपद असावे – रयत क्रांती संघटनेची ठाम मागणी

- प्रत्येक राज्यात उपपंतप्रधानपद असावे – रयत क्रांती संघटनेची ठाम मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई
भारतासारख्या लोकसंख्येने जगात आघाडीवर असलेल्या देशात प्रत्येक राज्याच्या समस्या, गरजा आणि विकासाची दिशा वेगवेगळी आहे. हे लक्षात घेता प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र उपपंतप्रधानपद निर्माण करून त्या राज्यात उपपंतप्रधान नेमण्यात यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी देशाच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही भूमिका मांडली आहे. भारतामध्ये २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश असून प्रत्येक राज्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरणीय परिस्थिती वेगळी आहे. मात्र सध्याची शासन व प्रशासन व्यवस्था या सर्व बाबींना पुरेसा न्याय देताना कमी पडत असल्याचे वास्तव आहे.
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून अनेक राज्यांमध्ये तेच तेच पक्ष, तेच आमदार, खासदार व मंत्री सत्तेत असल्याने व्यवस्थेमध्ये ढिसाळपणा आला आहे. अनेक ठिकाणी जनतेच्या विकासाऐवजी सत्तेचा वापर वैयक्तिक व पक्षीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व न्यायव्यवस्थेचा पूर्वीचा दरारा कमी होत चालला आहे.
दुसरीकडे, देशभरात अनेक अभ्यासू, प्रामाणिक व समाजहित जपणाऱ्या व्यक्ती सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय क्षेत्रात नि:स्वार्थपणे कार्यरत आहेत. मात्र या व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेत उतरून शासनात सहभागी होणे शक्य होत नाही. आजची राजकीय परिस्थिती पाहता राजकारणातून जनतेचे व देशाचे कल्याण करण्याची भावना दुर्लक्षित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
अशा परिस्थितीत राजकारणापासून दूर राहून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना राज्य पातळीवर उपपंतप्रधान म्हणून संधी दिल्यास त्या राज्याच्या तसेच देशाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास भानुदास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
ही मागणी औपचारिक पत्राद्वारे राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
भानुदास शिंदे
राज्य प्रवक्ते, रयत क्रांती संघटना
महाराष्ट्र राज्य
मो. ९८२३३०२७११



