येवला तालुक्यात उद्या शेतकऱ्यांचा ज्वालामुखी उसळणार! कांदा-मका उत्पादकांचा जनआक्रोश मोर्चा – प्रशासनाला जाग येणार का?
येवला तालुक्यात उद्या कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड जनआक्रोश मोर्चा उसळणार असून, या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू

येवला तालुक्यात उद्या शेतकऱ्यांचा ज्वालामुखी उसळणार! कांदा-मका उत्पादकांचा जनआक्रोश मोर्चा – प्रशासनाला जाग येणार का?
नाशिक | येवला प्रतिनिधी – प्रविण पाटील
येवला तालुक्यात उद्या कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड जनआक्रोश मोर्चा उसळणार असून, या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अवकाळी पाऊस, पडलेले बाजारभाव, वाढलेले उत्पादन खर्च आणि वाढती कर्जबाजारी परिस्थिती यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. कांदा आणि मका उत्पादक शेतकरी आज संकटाच्या खाईत उभा आहे, मात्र शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.
“आता सहनशक्ती संपली… हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही!” — अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने आंदोलनात उतरावे, असे जोरदार आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हीच निर्णायक वेळ असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा असलेला शेतकरी आजही उपेक्षित आहे. “शेतकरी आणि जवान देशाचे आधारस्तंभ” असतानाही त्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या:
शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी
वीज बिल माफी
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व नुकसानभरपाई
कांदा, मका यांसह सर्व कृषी उत्पादनांना हमीभाव (MSP)
निफाड, चांदवड, नांदगाव, कोपरगाव, वैजापूर, मालेगाव यांसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा मोर्चा केवळ आंदोलन नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंतिम आवाहन:
“चला… आता वेळ आली आहे!
आपल्या हक्कासाठी, आपल्या पिकासाठी, आपल्या भविष्याकरिता…
शेतकरी एकत्र या, रस्त्यावर या, आंदोलनात सहभागी व्हा!
आज नाही उठलो तर उद्या उशीर होईल…!”




