उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वझर आघाव येथील नागरिकांची भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वझर आघाव येथील नागरिकांची भावपूर्ण श्रद्धांजली
रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात असून सर्वसामान्य जनतेपासून ते राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत सर्वांनीच या धक्कादायक घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वझर आघाव येथे ग्रामस्थांनी एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गावातील चौकात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.
श्रद्धांजली सभेदरम्यान अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संपूर्ण परिसर शोकमय वातावरणाने भरून गेला होता. अनेक नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते, तर उपस्थितांच्या मनात दादांबद्दल असलेली आपुलकी आणि आदरभाव स्पष्टपणे जाणवत होता.
यावेळी उपस्थितांनी अजित दादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्याचा आवर्जून उल्लेख केला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, सिंचन, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. विशेषतः शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला, हे उपस्थितांनी आठवले.
“अजित दादा पवार हे स्पष्टवक्ते, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेता गमावला आहे,” अशी भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.
श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने वझर आघाव गावातील नागरिकांनी अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याला सलाम केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी काम करत राहण्याचा संकल्पही यावेळी अनेकांनी व्यक्त केला.




