
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला मेळावा – सारोळा गावातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती
कन्नड, विशेष प्रतिनिधी :
कन्नड तालुक्यातील सारोळा हे गाव आदर्श गावाचा दर्जा मिळविण्याकडे भक्कम पावले टाकत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचा भाग म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सारोळा येथे गुरुवार, दिनांक 18 रोजी महिलांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सरपंच सौ. सविताताई जंगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यास गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाचनवेल शाखेतर्फे महिलांना विमा संरक्षणाची मोठी सुविधा पुरविण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (वार्षिक प्रीमियम फक्त ₹436) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (वार्षिक प्रीमियम फक्त ₹20) या दोन्ही योजनांतर्गत तब्बल 75 महिलांचे फार्म भरून तत्काळ विमा कवच प्रदान करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी, आर्थिक धोक्यांपासून संरक्षणासाठी व स्वावलंबन वाढविण्यासाठी या योजनांचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी स्पष्टपणे जाणवले.
गावातील अजूनही विमा न झालेल्या महिलांना या योजनांत सामावून घेण्यासाठी पुढील काही दिवसांत पुन्हा एक मेळावा आयोजित करण्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी अशोक काळे यांनी दिली. महिलांनी या योजना अधिकाधिक संख्येने स्वीकारून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनातून केले.
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक कुवर पाटील यांनी महिलांना योजनांची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उपसरपंच भागवत बिघोत, जगन जंगले, सदस्य ताई धनगे, उमेद प्रभाग समन्वयक कौतिक वाघ, ICRP स्मिता भोसले, उपजीविका सखी लंका बिगोत, बचत गटातील महिला, आशा व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ऑपरेटर तसेच बँक मित्र गणेश बनकर, अनिल चौथमल, अमोल थोरात, बाळू मोरे आणि संतोष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण, आर्थिक संरक्षण आणि ग्रामीण विकासाची दिशा दर्शवणारा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. गावातील महिलांना सक्षम व जागरूक बनविण्यासाठी ग्रामपंचायत तसेच बँक प्रशासनाचा संयुक्त उपक्रम यशस्वी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




