धुळगाव (ता. येवला) येथे विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात
येवला तालुक्यातील धुळगाव येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात

धुळगाव (ता. येवला) येथे विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
येवला तालुक्यातील धुळगाव येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. माजी मंत्री Chhagan Bhujbal यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे पूर्ण झालेल्या सुमारे १५ लाख रुपयांच्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या कार्यालयामुळे गावातील नागरिकांना महसुलाशी संबंधित विविध कामे आता अधिक सोप्या आणि जलद पद्धतीने पूर्ण करता येणार आहेत.
तसेच १६ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत धुळगाव येथे सुमारे १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या योजनेमुळे धुळगावसह परिसरातील अनेक गावांना भविष्यात नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवीन ग्राम महसूल अधिकारी कार्यालय सुरू झाल्यामुळे गावातील दाखले, नोंदी, जमीनविषयक कामे, विविध प्रमाणपत्रे आदी प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजनेमुळे भविष्यात धुळगाव परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना धुळगावचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडवून आणणे, गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध करून देणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगण्यात आले. तसेच मा. ना. Chhagan Bhujbal यांच्या मार्गदर्शनाखाली धुळगावच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही यावेळी आश्वासन देण्यात आले.
या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच धुळगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा विकासकामांना गती मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.




