गड्डी माता जत्रेतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा विश्वासाचा संदेश; जनतेचा वाढता कल
वेन्हारा इलाका पट्टीतील पुणुर जंगल परिसरात पार पडलेल्या पारंपरिक गड्डी माता जत्रेमध्ये

गड्डी माता जत्रेतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा विश्वासाचा संदेश; जनतेचा वाढता कल
जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
वेन्हारा इलाका पट्टीतील पुणुर जंगल परिसरात पार पडलेल्या पारंपरिक गड्डी माता जत्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने प्रभावी उपस्थिती नोंदवत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी भूमिका बजावली, असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. धार्मिक श्रद्धा, लोकसंस्कृती आणि जनतेशी थेट संवाद यांचा सुरेख संगम या जत्रेत अनुभवायला मिळाला.
या जत्रेच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रमुख नेत्या भाग्यश्री ताई (आत्राम) हल्गेकर यांनी गड्डी माता देवीचे दर्शन घेत भाविकांशी थेट संवाद साधला. केवळ राजकीय उपस्थिती न ठेवता श्रद्धेची कृतीतून प्रचिती देत त्यांनी तब्बल दोन किलोमीटर अंतर पायदळ चालत देवीचे दर्शन घेतले, यामुळे उपस्थित भाविकांमध्ये विशेष सकारात्मक प्रतिक्रिया उमटली.
भाग्यश्री ताई यांच्या या कृतीमधून “राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून जनतेच्या विश्वासासाठी असते” हा संदेश ठळकपणे पोहोचल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. आदिवासी भागातील श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा आदर करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचेही भाविकांनी सांगितले.
या वेळी पक्षाचे नेते जितेंद्र टिकले, एटापल्ली नगरसेवक जयराज जी. हल्गेकर, विनोद चव्हाण, अभिलाष नागुलवार, विलास कोवाशे, श्रीकांत जी. कोकुलवार, छत्तूभाऊ लटारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जत्रेच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आदिवासी हक्क, जंगलाशी संबंधित प्रश्न, रोजगाराच्या संधी, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत विकासकामांबाबत आपली ठाम व स्पष्ट भूमिका मांडली. सत्तेपासून दूर असतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडे नागरिक आशेने पाहत असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, लोकसंस्कृती, श्रद्धा आणि आदिवासी अस्मितेला जपणारे नेतृत्व हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. गड्डी माता जत्रेसारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमातून जनतेशी नाळ जोडणारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष सध्या या भागात विश्वासाचा केंद्रबिंदू ठरत असून, जनतेचा वाढता कल याच पक्षाकडे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.




