श्री व्यंकटेश महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागांतर्गत कार्यरत असलेल्या निवडणूक साक्षरता क्लब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC)

श्री व्यंकटेश महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा
देऊळगाव राजा ( प्रतिनिधी भिमराव चाटे )
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागांतर्गत कार्यरत असलेल्या निवडणूक साक्षरता क्लब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकशाही बळकट करण्यासाठी सजग व जबाबदार मतदार घडवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. महेंद्र साळवे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी भारतीय संविधानाने कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा समान अधिकार हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे नमूद केले. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, या लोकशाहीच्या मजबुतीसाठी तरुण मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व निर्णायक आहे, असे त्यांनी सांगितले. युवकांनी कोणत्याही आमिषाला, जात-धर्माच्या प्रलोभनाला किंवा भावनिक भूलथापांना बळी न पडता निर्भयपणे, विवेकबुद्धीने मतदान करावे आणि लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. गजानन तांबडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सशक्त लोकशाहीसाठी सजग, जागरूक व जबाबदार मतदार घडणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या या महोत्सवात जबाबदार नागरिक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना भावी पिढीमध्ये संविधानिक मूल्यांची जोपासना करणे, लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करणे व मतदानाच्या अधिकाराचे भान निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निशा मोरे हिने प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार कु. वैष्णवी राऊत हिने मानले. महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव व प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत आवटी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामेश्वर माने, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती ढोकले, राष्ट्रीय कॅडेट कोर अधिकारी डॉ. महेश तांदळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




