येवला तालुक्यात अवकाळी पावसाची मुसळधार हजेरी; हिवाळ्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
येवला तालुक्यात आज दिनांक २७ जानेवारी रोजी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुका हादरून गेला

येवला तालुक्यात अवकाळी पावसाची मुसळधार हजेरी; हिवाळ्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
नाशिक | येवला | प्रतिनिधी : प्रविण पाटील
येवला तालुक्यात आज दिनांक २७ जानेवारी रोजी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. आजचा दिवस म्हणजे पूर्णतः हिवाळी हंगाम, या काळात पावसाची शक्यताच नसते. मात्र निसर्गाने अचानक घेतलेल्या या अनपेक्षित व अवकाळी वळणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे.
मला
या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील टोमॅटो, कांदा, गहू, भाजीपाला, फळबागा तसेच आंबा यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः सध्या आंबा पूर्ण फुलोऱ्यात असून हा पाऊस आंबा पिकासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. फुलगळ, बुरशीजन्य रोग आणि उत्पादन घट होण्याची शक्यता शंभर टक्के आहे.
याचबरोबर गहू पीक फुलोरा अवस्थेत असल्याने पुढील काही दिवस राहणारे धुके व धुही हे गहू पिकासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. आज पडलेला पाऊस जरी काही मिनिटांचा असला तरी त्यानंतर निर्माण होणारी आर्द्रता, धुके व थंडीमुळे पुढील ८ ते १० दिवसांत गहू, भाजीपाला व फळबागांचे पूर्ण नुकसान होण्याची दाट शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकरी वर्गात सध्या तीव्र संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे.
“निसर्गाने घाला घातला, शासन काहीच लाभ देईना आणि निसर्ग जगू देईना” अशा वेदनादायी प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.
शासनाकडून नेहमीप्रमाणे असा युक्तिवाद केला जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत की,
“पाऊस फक्त २० मिनिटांचा होता”,
“पर्जन्यमापकात ६५ मिमी पेक्षा जास्त नोंद नाही”,
आणि त्यामुळे नुकसानभरपाई देण्याचे कारण नाही.
मात्र प्रत्यक्ष वास्तव हे वेगळे आहे. या थोड्याशा पावसामुळे पुढील आठवडाभर राहणाऱ्या धुक्याने व धुईने पिकांचे शंभर टक्के नुकसान होणार आहे, हे प्रशासनाने समजून घेणे गरजेचे आहे.
म्हणूनच आज पडलेल्या या अवकाळी पावसाची तात्काळ नोंद ग्राह्य धरून,
फुलोऱ्यात असलेल्या पिकांचा विशेष सर्वे करावा
आंबा, गहू, भाजीपाला व फळबागांचे प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान जाहीर करावे
- शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी
अशी जोरदार मागणी येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
वारंवार होणाऱ्या हवामान बदलांचा फटका सहन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता केवळ आश्वासनांची नाही, तर तत्काळ कृतीची गरज आहे, अशी भावना संपूर्ण तालुक्यातून व्यक्त होत आहे.




