येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती

येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
नाशिक / येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी “हरवलेली पाखरे” या उपक्रमांतर्गत व्याख्याते प्रा. विजय संपतराव सोनवणे सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
माता रमाई या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर कौटुंबिक, सामाजिक व मानसिक आधार देणाऱ्या, दिन-दलितांच्या कैवारी होत्या. त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त प्रा. विजय सोनवणे सर यांनी आपल्या व्याख्यानातून माता रमाईंची त्यागमय जीवनशैली, संघर्ष व सामाजिक योगदान प्रभावीपणे समाजापुढे मांडले.
कार्यक्रमात माजी सरपंच रवींद्र गुंजाळ व सामाजिक सेवक नंदूभाऊ गुंजाळ यांनी व्याख्यात्यांचे स्वागत केले. पोलीस पाटील पुष्पा मनोहर गुंजाळ, उपसरपंच राणी संतोष गुंजाळ व सामाजिक सेविका मेघानंद गुंजाळ यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व औक्षण केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मोकळ मॅडम होत्या. तसेच शिव युद्ध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक कानिफनाथ मढवई सर, महेश पाटील सर तसेच महारुद्र तालीम संघाच्या युवकांनी व्याख्याते प्रा. विजय सोनवणे सर यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ यांनी केले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, बंधू-भगिनी, तरुण युवक-युवती तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात प्रा. विजय सोनवणे सर म्हणाले की, माता रमाई यांनी स्वतःच्या जीवनातील हालअपेष्टा सहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी प्रसंगी दागिने विकले, उपासमार सहन केली आणि त्यांना आर्थिक व मानसिक बळ दिले. त्यांच्या त्यागामुळेच बाबासाहेब उच्च शिक्षित झाले आणि पुढे भारताचे संविधान निर्माण करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी पूर्ण केले.
कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव व प्रेरणा निर्माण केली.
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील



