बालविवाहयुवावाशिमविवाह

बालविवाहमुक्त आणि लिंगसमतामूलक महाराष्ट्रासाठी निर्धार करुया जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत ‘आपला संकल्प’ जनजागृती रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा झेंडा

बालविवाहमुक्त आणि लिंगसमतामूलक महाराष्ट्रासाठी निर्धार करुया जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

      वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे 

बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत ‘आपला संकल्प’ जनजागृती रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा झेंडा

वाशिम, दि.३ जानेवारी (जिमाका)

लिंग गुणोत्तर हे समाजाच्या संवेदनशीलतेचे व प्रगतीचे महत्त्वाचे द्योतक आहे. मुलींचा जन्म, शिक्षण, आरोग्य आणि सन्मान याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याशिवाय लिंग गुणोत्तरात अपेक्षित वाढ होणार नाही. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने व समाजाने मुलींच्या संरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा. बालविवाह, लिंगभेद व भेदभावाच्या मानसिकतेला आळा घालून मुलींना समान संधी देणे ही काळाची गरज आहे. प्रशासनासोबतच नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेऊन लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

बेटी बचाव बेटी पढाव या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.एस. चौखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे, परिविक्षाधीन अधिकारी गणेश ठाकरे व गजानन पडघान, निती आयोगाच्या जिल्हा प्रकल्प प्रमुख श्रीमती निलिमा भोंगाडे , जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, डेमो‌ स्वप्नील‌ चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

बालविवाहास प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे तसेच लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

रॅलीदरम्यान ‘बालविवाह रोखा – मुलींचे भविष्य वाचवा’, ‘मुलगी शिकली तर समाज घडला’, ‘लिंगभेद नको, समानतेला होकार’ अशा आशयपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी फलक, पोस्टर्स व घोषवाक्यांच्या माध्यमातून समाजाला प्रभावी संदेश दिला.

यावेळी पुढे मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री कुंभेजकर म्हणाले की, ‘लिंग गुणोत्तर हे समाजाच्या संवेदनशीलतेचे व प्रगतीचे महत्त्वाचे द्योतक आहे. मुलींचा जन्म, शिक्षण, आरोग्य व सन्मान याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याशिवाय लिंग गुणोत्तरात अपेक्षित वाढ होणार नाही. बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून ती मुलींच्या सर्वांगीण विकासास अडथळा ठरते. त्यामुळे प्रशासनासोबतच पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन बालविवाह रोखण्यासाठी आणि लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत.

मान्यवरांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, मुलींच्या आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व तसेच बेटी बचाव बेटी पढाव योजनेतील विविध उपक्रमांची माहिती दिली.

बालविवाह आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाला कळविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. बालविवाह मुक्त, सुरक्षित, शिक्षित आणि सशक्त मुलींचा महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

रॅलीमध्ये विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!