मर्पल्ली नाल्यावरील पूल धोक्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताची भीती
एटापल्ली : तालुक्यातील मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेला मर्पल्ली नाल्यावरील पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे.

मर्पल्ली नाल्यावरील पूल धोक्यात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताची भीती
जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
एटापल्ली : तालुक्यातील मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेला मर्पल्ली नाल्यावरील पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. पुलाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात खच पडलेला असून, ठिकठिकाणी तडे गेलेले स्पष्टपणे दिसून येत आहेत. या अवस्थेमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हा पूल परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा दुवा असून, दररोज या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, मजूर तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मात्र पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली असतानाही प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, हे विशेष.
स्थानिक नागरिकांनी पुलाच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा संबंधित विभागांकडे तोंडी तसेच लेखी तक्रारी केल्या. तरीही आजपर्यंत केवळ पाहणीचे आश्वासन सोडले, तर प्रत्यक्षात दुरुस्ती किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या काळात नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी येते. अशा परिस्थितीत पुलावरून वाहतूक सुरू राहिल्यास पुलाचे अधिक नुकसान होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, तातडीने पुलाची सखोल पाहणी करावी, गरज असल्यास धोकादायक वाहतूक बंद करावी आणि कायमस्वरूपी मजबूत दुरुस्ती करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी ठाम मागणी मर्पल्ली परिसरातील नागरिकांकडून होत आहे.




